बदली झाली की गाव सोडावे लागते . घर बदलते . आजूबाजूचे लोकही बदलतात. तरीही आधीच्या गावची काही माणसे या ना त्या कारणामुळे आठवणीत राहतात . काही जाणीवपुर्वक संपर्कात राहतात.
पुर्वीच्या काळी दुरवरच्या माणसाशी संवाद साधायचा म्हणजे कठीणच बाब होती . संदेशवहनाची साधणे तितकीशी विकसित झालेली नव्हती . मग एखादा मनुष्य काही कामानिमित्य दुसर्या गावाला जायचा . तो ज्या गावी जात असे , त्या गावात जर काही नातलग राहात असतील , तर पहिल्या गावातील माणसे अशा जाणार्याबरोबर निरोप द्यायची मग असा प्रवासाला निघालेला व्यक्ती सवड काढुन त्या गावकर्यांच्या नातलगाकडे जायचा आणि निरोप सांगायचा .
टपालखात्याचा विकास झाला . एका गावातल्या माणसाचा संदेश दुसर्या गावात टपाल खाते पोहचवू लागले . पत्रलेखन ही एक कला बनली . अर्थात पत्र लिहून देणे आणि वाचुन दाखविणे या माध्यमातून पत्राची भाषा निरक्षरांनाही उमगू लागली .
आता टेलीफोन आणी मोबाईलचे युग आहे, त्यामुळे पत्र विशेष या गोष्टी मागे पडल्या आहेत . मोबाईलवरुन “ एसएमएस ” करणे सहजसुलभ झाले आहे आणि रिक्षावाला , मोलकरीण सर्वांकडे मोबाईल पोहोचला आहे .
माझी एक मैत्रीण मला दररोज “ एसएमएस ” करते . उत्तरादाखल मलाही तिला “ एसएमएस ” करावा लागतो . बर्याचदा या “ एसएमएस ” मध्ये थोरमोठ्यांचे विचार असतात .
“ एसएमएस ” वर होणारा खर्च वाचविण्यासाठी मी वेबसाईटवरुन संदेश पाठवू लागले . दररोज संगणकावर बसणे शक्य नसल्यामुळे आठवड्यातुन एकदाच संगणकावर बसुन मैत्रीणीला सात – सात “ एसएमएस ” पाठवू लागले .
एक दिवस मी “ एसएमएस ” टाईप केला “ दररोज एक सफरचंद डॉक्टरला दुर ठेवते , पण आठवड्यातुन एकाच दिवशी सात सफरचंद खाणे योग्य नव्हे. ”
चटकन माझ्या लक्ष्यात आले की , “ एसएमएस ” बाबतीत माझ्याकडुन नेमकी हिच चूक घडत होती . मी स्वतःला सुधारले . दररोज संगणकावर बसु लागले . आठवड्यातून एकदाच सात संदेश न पाठवतात दररोज एकच संदेश पाठवायला सुरुवात केली .
आहे की नाही गंमत ! जे सल्ले आम्ही इतरांना देत असतो , त्या सल्ल्याची सर्व प्रथम आम्हालाच गरज असते .
No comments:
Post a Comment