Tuesday 22 November 2011

मराठी बोधकथा गती करते गतप्राण



        माझ्या एका मैत्रीणीला तिचा वडीलांनी मोटर सायकल घेऊन दिली . ती मोटर सायकल आणि पेढे घेऊन ती माझ्याकडे आली . तिने माझ्या हातावर पेढा दिला . ती नवीन मोटार सायकल दाखविली आणि तिच्या विषयी माहिती देऊ लागली आणि सांगू लागली . या मोटार सायकलला प्रती 100 की. मी . गती देता येते . ती बोलत होती गाडीची माहिती सांगत होती परंतु माझ्या मेंदूचा काटा मात्र तिच्या गती या शब्दावरच अडकुन राहिला होता . आयुष्यामध्ये केवळ गती ही पुरेशी आहे काय ?
        गती असावी , पण ती कोणती गती असावी ? गती या शब्दाचा आपण जर विचार केला तर , आपल्याला प्रगती आणि अधोगती अशा दोन गती दिसुन येतात . प्रगती ही आम्हाला वर नेते . आमची उन्नती करते . आणि अधोगती आम्हाला रसातळाला नेते .  लोक केवळ गतीच्या मागे लागलेले आहे असे दिसून येते . परंतु ज्या गतीच्या मागे आपण लागलेलो आहे .ती प्रगती आहे की अधोगती आहे . याचा मात्र कुणी फारसा विचार करत असल्याचे दिसुन येत नाही .
       मोटार सायकलच्या गतीचा विचार करायचा म्हटले तर खुप गतीने जाणारी माणसं ही कुठेतरी पुढे जातात . त्याच्या अपघात होतो आणि मग देवाघरी जातात . याला गती म्हणायच का ? याला प्रगती म्हणायचं काय ? नंतर त्याच्या आयुष्यामध्ये येणारे कठीण दिवस पाहता अस दिसुन येत की त्यांची ही गती अधोगतीच होती . गतीच्या मागे लागून स्वतःच्या कुटुंबापासुन दुरावणारी माणसं यांनी आयुष्यामध्ये खरोखरच प्रगती साधली काय ? स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अधिक गती प्राप्त करुन घेण्यांसाठी , स्वतःच्या समाजाचा वापर करणारी माणसं यांनी आयुष्यामध्ये प्रगती साधली काय ? गती महत्वाची परंतु ती कुठली आहे ? प्रगती आहे की , अधोगती आहे याचा खरोखरच विचार करण्याची पाळी आपल्यावर येऊन ठेवली आहे . अन्यथा गती ही आम्हाला कधीही रसातळाला नेईल याचा नेम राहिलेला नाही .


मराठी बोधकथा डोके टेकवणे




       सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मनुष्य हा झाडावर राहायचा . झाडावर त्याचा अधिवास होता .  झोपणे ही झाडावर होते . हळूहळू सुधारणा होत गेली . मानवाला जमिनीवर उतरावे लागले . आणि झाडावरचा मनुष्य जमिनीवर आला. त्यांनी गुहांचा आश्रय घेतला आणि रात्री झोपण्यासाठी तो गुहांमध्ये राहू लागला. कधी तरी या गुहामध्ये झोपणार्‍या सर्वच माणसाला असे जाणवले असेल की, गुहेमध्ये जो उंचावरचा दगड आहे . तिथे जर झोपलो तर जमिनीवर सरपटणारे प्राणी यांच्यापासुन संरक्षण होते. आणि मग उंचावर झोपणाच्या माणसाचा शोध लागला . या शोधातुन कधी तरी माणसाने लाकडाच्या ओडक्यापासुन पलंग सदृष्य वस्तु बनवली आणि त्यावर तो झोपायला लागला . हा पलंग आहे त्या पेक्षा मऊ बनविता येईल काय ?असा विचार करत या मानवाने पलंगाच्या लाकडी चौकटी कायम ठेवल्या आणि मधला पलंग विणुन काढला . या विणुन काढलेल्या पलंगाला आम्ही आज रोजी बाज असे संबोधतो .
         आजकाल शहरामध्ये लोखंडाचे पलंग आलेले आहे . त्यामुळे शहरी लोकांना बाज किंवा खाट हा काय प्रकार आहे याची जाणिव नसावी परंतु खेड्या पाड्यामध्ये अजूनही बाज पाहायला मिळते . खेड्यामध्ये बाज विनणारे काही अनुभवी लोक असतात . हे खास अनुभवी लोकच बाज विणु शकतात .बाज विणल्यावर तिच्यावर ताण यावा व त्यावरुन कोणी पडु नये म्हणुन पाय कसतात . अर्थात खालच्या बाजुला झोपणार्‍या व्यक्तीचे पाये येणार असतात . म्हणुन बाज पायाकडुन कसली जाते .
        लहानपणी खेड्यात माझ्या घरी बाज होती . त्या बाजेवर खेळतांना मला मजा वाटायची, मी त्यावर कधी उड्या मारायची . कधी डोक्याच्या आधारे उड्या मारायची आणि एक दिवस अचानक माझे डोके बाजेवर असणार्‍या लाकडाच्या माथ्यावर आदळले . त्या बाजेच्या माथ्याला ठावा असे म्हणतात . ठाव्यावर डोके आदळल्यानंतर डोक्याला चांगल टेगूंळ आलं आणि डोकं धरुन मी बसले . मी दोरीवर आपल डोकं टेकवत आहे असा विश्वास मनात ठेवून डोक ठेवल्यामुळे आणि ते चुकीच्या जागी टेकवल्यामुळे डोक्याला मार लागला होता . त्यामुळे पश्चातापाची पाळी  माझ्यावर आली होती .
        आज ह्या घटनेकडे विचार करतांना डोक्यामध्ये विचार येतो की , बाजेवर चुकीच्या ठिकाणी डोके ठेवले तर डोक्याला मार लागतो  व आपल्या वर पश्चातापाची पाळी येते . परंतु प्रत्यक्ष आयुष्य जगत असताना अनेकदा चुकीच्या ठिकाणी आम्ही डोके टेकवतो . चुकीच्या ठिकाणी डोके टेकवले आहे ही बाब लक्षात यायला तसा उशीरच होतो आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा आमच्यावर पश्चातापाची पाळी आलेली अस्ते . आयुष्य जगत असतांना देवा धर्माच्या नावाखाली आम्ही बाबा बुवा याच्या पायावर डोक टेकवत जातो आणि हे लबाड बुवा आमचे शोषण करत जातात . जेव्हा आमच्या लक्षात येते की , आम्ही चुकीच्या ठिकाणी डोके टेकवीत आहोत तेव्हा बराच उशीर झालेला असतो . त्यामुळे या पुढे डोकं टेकवत असताना जरा सावध !  

मराठी बोधकथा स्नेहाचा धागा तोडु नका




      संध्याकाळची वेळ होती . अचानक आभाळ दातुन आले आणि जोरदार वारा वाहायला लागला . पाऊस देखील पडायला लागला . त्या जोरदार सुसाट वार्‍यामुळे विज कनेक्शन तुटून पडलं . लाईट येण्याची मुळीच शक्यता नव्हती . आजुबाजूला सगळ्यांकडे दिवे पणत्या मेणबत्या जळत होत्या . आमच्या घरी सुध्दा दिवे जळत होते . पण ते इनव्हरर्टवर जळत होते . आता ते इनव्हर्टर काही कालावधी नंतर ट्रीप होऊन बंद पडणार होते आणि घरभर अंधार होणार होता . मग माझे पती म्हणाले , अग ! तो हॉल मधला लाईट बंद कर . बेडरुम मधील छोटा लाईट  लाव . टी . व्ही देखिल बंद कर . मी बंद केले . जवळजवळ सर्व मोठे लाईट बंद करुन आणि छोटा लाईट लाऊन आम्ही अंगणामध्ये येऊन बसलो. अंगणामध्ये स्ट्रीट लाईटचा प्रकाश पडला होता . कधी नव्हे ती विजेची बचत करत होतो .
      मनामध्ये विचार आला की , शासन  एवढे ओरडू ओरडू सांगते की , विजेची बचत करा , विजेची बचत करा ! तेव्हा मात्र कुणालाच रस वाटत नाही . परंतु आज जेव्हा रात्रभर लाईट येणार नाही आहे याची आम्हाला स्पष्ट जाणीव झाली, तेव्हा आम्हाला कुणीही सांगीतले नसतांना आम्ही विजेची बचत करतोय आणि ती ही थोडी थोड्की नव्हे तर घरामधले सर्व लाईट बंद करुन . तो पर्यंत जो पर्यंत गप्पा मारायच्या आहेत किंवा झोपण्याची वेळ व्हायची आहे . त्या वेळेपर्यंत अंगणामध्ये स्ट्रीट लाईटच्या प्रकाशामध्ये येऊन बसलो आहोत .
     पुन्हा माझ्या डोक्यामध्ये विचार आला की , असे का व्हावे ? याच कारण म्हणजे जेव्हा एखादी वस्तू मुबलक असते तेव्हा तिची आपल्याला किंमत वाटत नसते , परंतु आता विज ही मर्यादीत आहे . इनव्हरर्टच्या बॅटरीमध्ये विज साठविलेली आहे . तेवढी विज पुरवायची असेच आहे . याची आम्हाला जाणीव झाली आणि म्हणुनच तिची आम्हाला किंमत वाटते . पाण्याचेही असेच आहे , एरवी खुप सारे पाणी वाह्त अस्ते परंतु जेव्हा आपल्याला माहित होतं की दोन दिवस नळ येणार नाहीच . तेव्हा मात्र पाण्याच्या थेंबा थेंबाचा हिशेब आम्ही ठेवतो .
      आयुष्यामध्ये प्रेमाचे तरी काय वेगळे आहे ? जेव्हा प्रेमाचा अमर्यात वर्षाव होतो तेव्हाच आम्हाला त्या प्रेमाची किंमत कळत नसते . परंतु प्रेमाचा वर्षाव करणारी व्यक्ती जेव्हा दूर जाते तेव्हा मात्र त्या व्यक्तीकडून मिळणार्‍या प्रेमाची खरी किंमत कळायला लागते . कारण तेव्हा तिच्याकडून मिळणारे प्रेम बंद झालेल असते . ती व्यक्ती दूर गेलेली असते . आयुष्यामध्ये जर प्रेम टिकुन ठेवायचे असेल , तर वेळीच त्याची किंमत ओळखली पाहीजे . त्याला योग्य तो आदर सन्मान द्यायला शिकल पाहिजे . अन्यथा तो प्रेमाचा स्त्रोत कधी दुर होईल ? कधी दुअरावेल ? हे सांगता येत नाही . विजेचे तुटलेले कनेक्शन जोडता येईल. खंडीत झालेला विजपुरवठा पुर्ववत सुरु होईल . परंतु प्रेमाचा  स्त्रोत जर खंडीत झाला किंवा दुरावला, तर तो जोडणे कठीणच . हे विचारात घेवूनच  एका सुफी संताने कदाचीत खालील ओळी रचल्या असाव्यात .

रहिमन धागा प्रेमका , मत तोडो चटकाय !
टुटे पर ना जुडे , जुडे तो गाठ पड जाय !!

मराठी बोधकथा संयम



      आमच्या लहानपणी खेळणी फारशी उपलब्ध नव्हती . मग जे मिळालं त्या आधारे खेळायचो . नदीवरुन माती घेऊन यायचो . ती भिजवायचो आणि मग त्या मातीचे बैल बनवायचो , कधी कधी गणपतीही बनवायचो , कधी कधी तिच माती घ्यायची आणि त्याच मातीचा गणपती बनवायचा . सारे मुलं मुली मिळुन हा खेळ आम्ही खेळायचो . आता मात्र जग बदललेले आहे . बाजारामध्ये छान छान अशा स्वरुपाचे खेळ विकायला आलेले आहे .
       नुकतेच मी नागपुरला गेले होते . खेळोण्याच्या दुकानात गेले . माझ्या छोट्या मुलीसाठी मी प्लास्टर ऑफ़ पॅरीस पासुन बनलेला प्राणी बनवण्याचा खेळ विकत घेवून आले . त्या खेळामध्ये प्लास्टीकचे साचे असतात आणि त्या साच्यामध्ये प्लास्टर ऑफ़ पॅरीस ओतायच आणि मग त्याचा बैलाचा आकार असेल , तर बैलाची मुर्ती तयार होते . मग जर का तो घोड्याच्या आकाराचा असेल, तर घोड्याची मुर्ती तयार होते . मुलांना हा खेळ खुप आवडतो आणि मग आम्ही घरी हा खेळ आणल्यावर प्लास्टर ऑफ़ पॅरीस भिजवलं द्रावण तयार केलं आणि ते त्या साच्यामध्ये टाकलं आत साच्यामधुन प्राणी बाहेर पडल्यावर नेमका कसा दिसतो . याची उत्सुकता माझ्या लहानशा मुलीला लागलेली आणि ती सारखा आग्रह धरु लागली . आई ! आत मधली मुर्ती काढुन बघ ना !    आई ! आत मधली मुर्ती काढुन बघ ना ! आणि मग तिच्या आग्रहास्तव मला तो साचा हाती घ्यावा लागला .वस्तुतः त्या खेळावर दिलेल्या सुचनेनुसार किमान अर्धा तास तरी द्यायचा होता . म्हणजे साच्यामधलं ते द्रवण घट होणार होतं . परंतु जवळ जवळ दहा मिनिट कमी असतांना आम्ही साच्यामधला तो प्राणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये तो प्राणी तुटला . आम्हा दोघांचेही मन खट्टू झालं
       दुसरं असा प्रसंग मला आठवतो  की , काही दिवसापुर्वी माझ्या हातात थोडं खरचतलं रक्त बाहेर आलं आणि त्यावर मी मलम लावलं . एक दोन दिवसांनी ती जखम बरी झाली त्यावर एक काळ्या रंगाची खिपली चढली आणि ती मला सारखी खटकत होती .म्हणुन हाताच्या नखाने मी ती खिपली काढ्ण्याचा प्रयत्न केला परंतु जखम पुर्णपणे सुखली नव्हती आणि खिपली काढताच आतील रक्त पुंन्हा वाहायला लागलं . पुन्हा तिन चार दिवस ती जखम बसायला लागले आणि या वेळी मात्र खिपली आपोआप गळून पडण्याची वाट पाहावी लागली .
      त्या दोन्ही उदाहरणाकडे विश्लेषक नजरेने पाहत असतांना मला एक अणि एकच तत्व दिसतो . ते म्हणजे आयुष्यामध्ये संयम अतिशय महत्त्वाचा आहे. संयम बाळगला नाही आणि उतावीळपणे कृती केली तर पश्चाताप मनुष्याच्या वाटेला येतो . साच्यामध्ये टाकलेला प्लास्टर ऑफ़ पॅरीस जर पुर्ण वेळ राहु दिलं नाही , ते वाळू दिलं नाही , आणि लगेच बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर प्राण्यांची मुर्ती सलग रुपात बाहेर न निघता तुटक किंवा फुटक्या रुपात बाहेर पडते . हाताला जखम झालेली त्यावरची खिपली जर पक्क न होऊ देता आम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा जखमच वाट्याला येते .
      या दोन्ही उदाहरणावरुन मला एवढाच बोध घ्यावासा वाटतो की, आयुष्य जगत असतांना संयम महत्वाचा हे लक्षात ठेवावं आणि संयम पाळत जगावं जेणे करुन अवेळी खिपली काढुन भळा भळा रक्त तुमच्या वाट्याला येणार नाही .


मराठी बोधकथा कष्टाची किंमत



 
         शेती मला खुप आवडते . पावसाळा पडला शेतामध्ये होणारी ती पेरणी त्या तिफणमागे चालणार्‍या बाया , निंदन करतांना म्हटल्या जाणारी ती गाणी , शेतामध्ये बहरलेल आणि डोलणारं हिरवगार पिक , कणसामध्ये भरलेली दाणे आणि ती दाणे टिपुन घेण्यासाठी आलेले पक्षी , पक्ष्यांचा चिवचिवाट , पक्षी हाकलुन लावण्यासाठी शेतात लावलेले बूजगावणे या सर्व गोष्टी मनामध्ये पक्के घर करुन राहीलेले आहेत . धाण्याची कापणी आणि मग घरी भरुन आणलेली पोती , ते सर्व मन मोहरुन टाकणारं वाटतं . आता शेताशी फारसा संबंध येत नसला तरी , माझे आजोबा शेती करायचे . लहाणपणी आजोबाकडे गेलो की , शेतामध्ये जायची . आमचा हट्ट ठरलेला असायचा मग आम्ही सर्व बहिण भाऊ आजोबांच्या बैलगाडीमध्ये बसुन शेतामध्ये जायचो .
        एकदा असाच हट्ट धरुन आजोबा सोबत शेतामध्ये जायला निघालो . जरा सकाळी लवकरच निघालो होतो . आजोबांनी बैलगाडीला बैल जोतले . आम्ही बैलगाडी मध्ये बसलो . आजोबा बैलगाडी हाकलु लागले आणि बैलगाडी शेताच्या दिशेने धावू लागली . बैलगाडीच्या मागे मागे घरचा मोती कुत्रा देखील धावू लागला . आम्ही शेतामध्ये पोहचलो . बैलांनी ती बैलगाडी खेचुन शेतापर्यंत आणली होती आणि आजोबा सतत बैलानी चालाव म्हणुन त्यांना तुतारी टोचत होते .
       एकदाची बैलगाडी शेतामध्ये येवून पोहचली . आजोबांनी बैलगाडीचे बैल सोडले . थोडावेळ आम्ही शेतामध्ये बसलो . मुंगाच्या शेंगा तोडल्या . थोड्या भुईमुंगाच्या शेंगाही उपटून सोबत घेतल्या . मग शेतामध्ये कापून ठेवलेले गवताचे भारे आजोबांनी बैलासमोर ठेवले . बैलानी गवत आणि बैलागाडीत सोबत आणलेला थोडा कडबा खाल्ला . आम्ही सोबत शिदोरी आणली होती . आम्ही शिदोरी खाल्ली . मोती कुत्र्याला भाकर देण्यात आली . शेतामधील धाण्याची पोती आजोबांनी गाडी मध्ये टाकली आणि तोवर दुपार झालेली होती . आम्ही घराकडे परत येवू लागलो . उन्ह जरा जास्तच होत उन्हा तान्हामध्ये ते बैल आमचं आणि त्या पोत्याच वजन घेवुन धावत होते . आजोबा त्यांना हाकलत होते . आणि मोती कुत्र्याकडे बघीतले , तर बैलगाडीच्या खालून मोती कुत्रा चालात होता .
       हे सगळं दृष्य , हा सर्व घटनाक्रम आठवतांना वाटतं की , बैल आकाराने मोठा असतो . कष्टाळू असतो . परंतु त्याच्या वाट्याला काय तर ओझे आणि भार ! आणि त्या मध्ये कसुर केला तर मार ठेवलेला आणि ऐवढ करुन त्याला खायला काय तर गवत आणि कडबा . याच्या विरुध्द मोती कुत्रा काय करत होता ? तर गाडीच्या माग माग चालत होता . उन्ह वाढले म्हणुन बैलगाडीच्या सावलीत चालत होता आणि त्याला मात्र ज्वारी पासुन बनलेली भाकरी !
     वस्तुतः ज्वारी पिकवण्यामध्ये कुत्र्याचा कुठलाही वाटा नव्हता . खरा वाटा तर बैलाचा होता परंतु बैलाच्या वाट्याला आला होता तो कडबा आणि मोत्यानं काहीच केलं नव्हतं तरी त्याच्या वाट्याला आली त्या ज्वारी पासुन बनलेली भाकरी !
     मला असं वाटत की , आमची व्यवस्था ही असीच ! की , जो राबतो त्याच्या वाट्याला निकृष्ट जीवन . अगदी बैलासारखं ! आणि जो राबत नाही त्याला मोत्यासारखं जीवन ! मोत्यानं कार्यालयाच्या सावलीमध्ये बसुन काम करावे . सर्व सुख त्याच्या वाट्याला आणि अन्नदाता मात्र बैलासारखा शेतामध्ये राबणार .   याला न्याय म्हणावे काय ?          

Thursday 3 November 2011

मराठी बोधकथा फुलणे



    
मनुष्य विविध कारणांनी झाडांची जोपासना करतो . त्यापैकी सावली मिळावी , शुध्द हवा मिळावी , फळे मिळावे, जमिनीची धुप थांबावी , पाने मिळावी , लाकुड मिळावे, फुले मिळावी इ. प्रमुख हेतू म्हणता येतील .
      फुलझाडे ही काही मोठी वाढणारी , तर काही लहान आकाराची लहान फुलझाडे कुंडीत वाढवता येतात आणि आयुष्यभर कुंडीतच राहतात . मोठ्या आकाराची फुलझाडे ही आधी कुंडीमध्ये वाढतात , पुढे त्यांचा आकार वाढतच जातो . सरतेशेवटी कुंडीला तडे जावू लागतात , फुटते आणि फुलझाडे जमिनित लावावे लागते . सुखंटाने कोष फोडावा तसे फुलझाड कुंडी तोडते .
     
      फुलझाडे केवळ बागेतच वाढतात असे नव्हे तर जंगलात देखील वाढतात .काटे कोरांटा , झोनिया इ . फुलझाडे जंगलात दरवर्षी नित्यनेमाने उगवतात . कोणाला त्यांचे बी पेरावे लागत नाही , खत पण टाकावे लागत नाही . पावसाळा आला की , ही फुलझाडे उगवतात, फुलतात .
       आतापर्यंत मी विविध प्रकारची फुले पाहीली आहेत . त्यापैकी कित्येक नर्सरीमधुन विकत आणलेली होती,  तर कित्येक जंगलात वाढलेली होती काही महागडी तर काही स्वस्त होती . या सर्वांमध्ये मला एक गुण आढळला तो म्हणजे सुंदरता .
       ही सर्वच फुले सुंदर असल्याचे प्रत्येकाला दिसून येईल . कुरुप फुल शोधूनही सापडणार नाही . मग त्याला एकदाचा गंध कसा का असेना ! फुले कुरुप नसतात कारण फुलण्याची कला त्यांची अवगत केलेली आहे . फुलण्याची कला अवगत असलेले जगात काहीही कुरुप असु शकत नाही . मग त्याचा रंग कसाही असो , रुप कसेही असो  ! मग फुल असो की मनुष्य असो !
       फुलतांना केवळ बाह्य रुपाने फुलता येते असे नाही . खरे तर आतुन फुलणे अधिक महत्त्वाचे . आतून फुललेली व्यक्ती रुपाने , रंगाने कशीही असली तरी आकर्षक वाटणारच !


Wednesday 2 November 2011

मराठी बोधकथा गर्दी



   
         निवडणुका , नेते , आणि सभा हे अतुट समिकरण आहे . निवडणुका जवळ आल्या की प्रचाराची रणधुमाली सुरु होते . गल्लोगल्ली , खांबा खांबावर बॅनर , पोस्टर झळकु लागतात . भोंगे लावलेल्या गाड्या फिरु लागतात .
      
          निवडणूकीच्या प्रचाराच्या साधनामधील अत्यंत महत्वाचे साधन म्हणजे प्रचारसभा ! मतदार संघात मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा पार पडल्या व या सभांना लाखोंच्या संख्येने लोक गोळा झाले की, विजय निश्चित झाला असे समजले जाते . सभेसाठी येणारा नेता जर लहान असेल तर हेलीकॉप्टरने येतो बर्‍याचदा जमलेली गर्दी हे नेत्यांचे भाषण ऐकण्यासाठी नव्हं तर उतरणारे आणि उडणारे हेलीकॉप्टर पाहण्यासाठी जमलेली असते .
      मोठ्या नेत्यांच्या सभेला मोठी गर्दी जमावी म्हणुन गावच्या स्थानिक नेत्यांना निरोप पाडले जातात . त्यांना ठराविक कार्यकर्ते आणण्याचे उद्दिष्ट दिले जाते. मग गावोगावचे हे स्थानिक नेते कार्यकर्ते गोळा करतात. आणि झेंडे लावलेल्या वाहनातून त्यांना सभास्थळी घेवून येतात. मुद्दाम आणलेल्या या लोकांची चहा पानाची , नास्त्याची व्यवस्था करावी लागते . प्रसंगी दिवसभराच्या मजुरीचे पैसे ही द्यावे लागतात . गर्दी जमविण्यासाठी किती हा खटाटीप ? आणि जमून जमून जमतात ती फक्त काही हजार माणसे !
      आषाडी, कार्तीकीला विठ्ठ्लाकडेही लोक जमतात .पण त्यांना कुणी सभेला जमण्याची सूचना दिलेली नसते . गाडी पाठविलेली नसते . चहापाणी आणि वाहनांची सोय केलेली नसते . मिळेल ते वाहन पकडून, प्रसंगी पायी चालत जावून भाविक पंढरीला पोहचतात . यामागची एकमेव प्रेरणा म्हणजे श्रद्धा   ! विठ्ठलावर ज्याप्रमाणे भाविकांची श्रद्धा आहे , तशी मतदाराची श्रद्धा नेत्यावर निर्माण झाली तर मग सभेला आपोआप गर्दी जमू लागते . शेवटी सारा श्रद्धचा खेळ !